Title

Astrology Blog by Anagha Bhade


Thursday 30 January 2014

पत्रिकेतील मंगळ

जसे आपल्याला पैकी बऱ्याच जणांना स्वत: ची रास  माहित असते त्याप्रमाणे लग्न झाले असल्यास  किंवा लग्नाचे वय असल्यास ' मंगळ ' आहे कि नाही इतकी जुजबी माहिती असते .मंगळ आहे म्हणजे पत्रिकेतील १,४,७,८,१२ ह्या स्थानात मंगळ  असणे . दक्षिणेत द्वितीय स्थानातील मंगळ  पण 'मंगळ दोष 'धरतात . आता ह्यात परत सौम्य मंगळ ,कडक मंगळ असे प्रकार आहेत . मंगळ दोषाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास दाते पंचांगात वाचता येईल . तूर्तास ह्या लेखात आपण मंगळाच्या बाकीच्या बाजूंचा विचार करू .

मंगळ म्हणजे पराक्रम ,धडाडी , शक्ती ,साहस , उष्णता . तसेच मंगळ  हा  भावंडांचा कारक ग्रह आहे .भावंडा संबंधी प्रश्न बघताना मंगळाचा विचार करावा लागतो . तसेच मंगळावरून जमिनी बाबत प्रश्नांचा पण विचार केला जातो.मंगळाला भूमिपुत्र पण म्हणतात . मंगळ हा पुरुष ग्रह आहे . नैसर्गिक पापग्रह म्हणून मंगळ धरला जातो .

मंगळ हा पराक्रम ,धैर्य , साहस ह्यांचा कारक असल्याने पोलिस अधिकारी ,मिलिटरी ऑफिसर इ  .लोकांच्या पत्रिकेतील मंगल बलवान असतो / असायला हवा .मंगळ हा electricity चा पण कारक आहे त्यामुळे electrician , engineers अशा लोकांचा पण विचार करतात . तसेच मंगळ surgery चा कारक असल्याने बर्याच सर्जन्स च्या पत्रिकेत मंगळ बलवान असतो. मंगळ मैदानी खेळांचा कारक असल्याने बर्याच खेळाडूंच्या पत्रिकेत मंगळ उच्च राशीत किंवा शुभयोगात सापडतो .

शुभयोगातील मंगळ चांगले खेळाडू ,पोलिस अधिकारी ,मिलिटरी ऑफिसर,electrician , engineers,surgeons बनवेल पण बिघडलेला / अशुभ योगातील मंगळ गुंड ,खुनी, तापट बनवतो .

मंगळ  हा उष्णता निर्माण करणारा ग्रह आहे . त्यामुळे सर्वप्रकारचे उष्णतेचे विकार , ताप , जळणे ,भाजणे इ. मंगळावरून  बघतात .विजेचा शॉक बसणे , सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे रक्तातील दोष , पित्तरोग इ.विचार मंगळावरून केला जातो .
शुक्राच्या  युतीतील मंगळ  व्यक्तीस जास्त कामी करतो .मंगल-हर्शल युती आगीशी / विजेशी संबंधित अपघात घडवते 
बिघडलेला मंगळ ( मुख्यत्वे अष्टमात असणारी मंगळ - शनि युती ) अपघात कारक आहे . 
अर्थात हे वाचून कोणीही लगेच अनुमाने ( conclusions) काढू नयेत कारण नुसती  युती असे करणार नाही तर त्या ग्रहांची अवस्था ( बाल,कुमार,युवा,वृद्ध ,मृत ) काय आहे , महादशा ,गोचर , भाव अशा बर्याच गोष्टींचा विचार करावा लागतो . 
( ग्रहांच्या अवस्थेवर पुढे वेगळा लेख लिहीन) 

मंगळाची स्वत: ची रास मेष व वृश्चिक आहे तसेच उच्च रास मकर व नीच रास कर्क आहे .

पत्रिकेतील मंगळ  बिघडला असल्यास भावंडाना मदत करणे चांगले (karmik  healing ) . 


Sunday 26 January 2014

पत्रिकेतील रवि

खरेतर रवि हा तारा  आहे परंतु पत्रिकेत मात्र त्याला ग्रह म्हटले आहे . कदाचित मानवी  जीवनात रवि चा थेट परिणाम होत असल्याने बाकी इतर  ग्रहांबरोबर रविने  पत्रिकेत महत्वाचे स्थान मिळवले व तो पण ग्रह ( पत्रिकेपुरता ) म्हणूनच गणला जाऊ लागला असेल .तर अशा ह्या स्वयंप्रकाशी रविची माहिती  देण्याचा प्रयत्न करते .

 रवि म्हणजेच सूर्य (sun ) . रवि म्हणजे प्रकाश , उर्जा .रविवरून म्हणूनच उत्साह ,कर्तुत्व ,मानसन्मान , प्रतिकारशक्ती , अधिकार , सरकारी कर्मचारी , सरकारी संस्था इ. चा विचार होतो .तसेच रवि हा पित्याचा कारक ग्रह मनाला आहे त्यामुळे पितृसौख्याचा विचार पण रविवरून करतात .बायकांच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने रवि, मंगळ ह्या ग्रहांना महत्व आहेच . 

जसे पत्रिकेतील शुभ रवि त्याच्या अमलाखाली / कारकत्वात असणाऱ्या गोष्टी वृद्धिंगत करतो त्याचप्रमाणे बिघडलेला म्हणजे  अशुभ योगात असणारा रवि अधिकार , पितृसौख्य , प्रतिकारशक्ती इ. गोष्टीची वाईट फळे पण देतो . 

 बिघडलेला रवि गर्विष्ठ बनवतो. रवीचा मुख्य शत्रू म्हणजे शनि . रवि- शनि युती किंवा केंद्रयोगात रवि शनि मुळे बिघडतो . तसेच रवि- राहू युती सुद्धा बिघडलेल्या रविचेच उदाहरण आहे . हि युती जर नवमात असेल तर पितृदोष आहे असे म्हणतात . पितृदोष म्हणजे जसे आपल्या आधीच्या पिढीतील लोकानी केलेल्या पुण्याचे आपण भागीदार होतो तसेच पापाचे पण होतो तर पितृदोष असणाऱ्या पत्रिकेत आधीच्या पिढ्यांमध्ये केलेल्या वाईट कर्मांचे फळ हा दोष असणाऱ्या व्यक्तीस भोगावे लागते  . यावर उपाय म्हणजे मला वाटते कि आपण कायम चांगलीच कर्म  करावीत .

बिघडलेल्या रविमुळे  हृदयाचे आजार, प्रतिकार्शक्तीचा अभाव , सर्व प्रकारचे ताप, पाठीच्या मणक्यांचा त्रास , डोळ्यांचे आजार , शरीरातील पांढर्या पेशींचा अभाव इ. गोष्टी संभवतात . 

रवि च्या अमलाखाली शासकीय नोकरी, संरक्षण व्यवस्था , ऊर्जानिर्मिती केंद्रे इ. गोष्टी येतात . तसेच वैदकीय (doctor etc ) पेशाला सुद्धा रवि कारणीभूत असतो .

कृष्णमुर्ती  पद्धतीमध्ये सुद्धा रविला खूपच महत्व आहे . घटना कधी घडेल हे काढण्याकरता रुलिंग प्लानेट च्या राशी नक्षत्रातून रविचे भ्रमण घेतले जाते . 

पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात  पण रवि रास ( sunsign ) महत्वाच्या मानल्या जातात विशेष करून स्वभाव कळण्याच्या दृष्टीने .लिंडा गुडमन ह्यांचे sunsign वरील पुस्तक त्या बाबतीत बरेच प्रसिद्ध आहे . परंतु कोणत्याही एका ग्रह मुळे स्वभाव ठरत नाहीतर तो सगळ्या ग्रहांचा तसेच लग्न्राशिचा एकत्रित परिणाम असतो . 

रविवरुनच आपण दिशा ठरवतो .त्यामुळे लग्नरास ठरवताना पण रवि किती महत्वाचा आहे हे कळले असेलच! 

Wednesday 22 January 2014

पत्रिकेतील बुध

' बुध'  म्हटले कि लगेच बुद्धि , हजारजबाबी पणा , वक्तृत्व इ . गोष्टी डोळ्यासमोर येतात . बुध माणसाला गणिती बुद्धी देतो . आकलन शक्ती देतो. जेव्हा आपण म्हणतो कि एखाद्या मुलाचे ग्रास्पिंग चांगले आहे .त्याला  पटकन  एखादी गोष्ट कळते. जास्त अभ्यास न करता चांगले मार्क मिळतात . अशावेळेस आपण त्याच्या पत्रिकेतल्या बुधा बद्दलच बोलत असतो . जितका पत्रिकेतला बुध चांगला तेवढी आकलन शक्ती चांगली .

 गुरु माणसाला व्यापक बुद्धी देतो तर बुध गणिती बुद्धी किंवा instant  solution काढताना जी बुद्धी लागते ती देतो . उदा . स्कॉलरशीप च्या परीक्षेकरता बुध मदत करेल तर डॉक्टरेट मिळवण्यासाठी  गुरूची मदत होईल .बुध हा वाचा ( बोलणे ) ,मामा- मावशा ( मातुल घराणे) ,  विनोदबुद्धि इ. गोष्टींचा कारक ग्रह आहे .

बुध हा communication,तसेच लिखाणाचा  ग्रह आहे . त्यामुळे पत्रकार , सेल्समन , सर्व प्रकारचे एजंट्स  इ. बुधाच्या अमलाखाली येतात . तसेच बुध हा analysis करणारा ग्रह आहे विशेषत: कन्या राशीतील बुध . त्यामुळे चिकित्सक लोक, ज्योतिषी ,critics , analyst इ. लोकांचा पण बुध चांगला असावा लागतो .  विनोदी लेखन करणारे , वकील , व्यापारीवर्ग  हे सुद्धा बुधाच्या अमलाखाली येतात  .

बुधाच्या स्वत: च्या राशी मिथुन व कन्या आहेत . ह्याचा अर्थ जेव्हा बुध मिथुनेत किंवा कन्येत असतो तेव्हा तो स्वराशीत आहे असे म्हणतात . बुधाची उच्च रास कन्या व नीच रास मीन आहे .

 आता मिथुन व कन्या ह्या दोन्हीही द्विस्वभाव राशी आहेत . त्यामुळे बुध एखादी गोष्ट  एकाहून अधिक वेळा घडवून आणतो. कृष्णमुर्ती पद्धती मध्ये बुधाचा हा गुणधर्म बर्याच वेळा वापरला जातो . उदा  सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल किंवा बुधाच्या नक्षत्रात असेल व कोणत्याही द्विस्वभाव राशीत असेल तर एकाहून अधिक विवाह  होण्याची शक्यता असते / होतात .
तसेच दशमस्थनाचा उपनक्षत्र स्वामी जर बुध असेल तर बर्याच वेळा एकाहून अधिक गोष्टी (अर्थार्जना करता ) करण्याकडे कल  असतो .
तसेच प्रश्नकुंडली मध्ये आजार संबंधी प्रश्न असेल व षष्ठ स्थानाचा उ.न स्वमि जर बुध आला तर second opinion घ्या म्हणून सांगतात . 

आता हा लेख लिहितना पण  सलग एका वेळेस लिहून झाला नाही . हा बुधाचाच परिणाम म्हणायचा !

Medical  astrology मध्ये बुधावरुन nervous system , चक्कर येणे , मेंदूचे विकार , श्वसनाचे  आजार ,दमा ,पचन ,आतडी ,वाचादोष,त्वचारोग  इ. गोष्टी  बघतात  . ज्यांच्या पत्रिकेतील बुध बिघडलेला आहे त्यांना कार्मिक हिलिंग म्हणून मामा- मावशा ( मातुल घराणे)  ह्यांच्याशी संबंध चांगले ठेवणे तसेच वेळप्रसंगी त्यांना मदत करणे इ. सुचवले जाते .

माझ्यापात्रिकेतील  बुधामुळेच मला ब्लॉग  लिहिण्याची बुद्धी होत असावी का ?

Thursday 16 January 2014

विरोधी स्थान

त्रिकेच्या बाराही स्थानांचा आपण विचार केला . जसे प्रत्येक स्थानावरून बघणाऱ्या गोष्टींची फळे त्या महादशा / अंतर्दशेत मिळतात तसे त्याच्या आधीचे ( त्या स्थानाचे व्यय स्थान ) हे त्या स्थानाचे विरोधी फळ देत असते  . 
आता कोणती दशा कसे फळ देईल ह्या संबंधी मला 'कृष्णमुर्ती पद्धती 'जास्त प्रभावी वाटते . ह्या  पद्धतीनुसार आपण प्रत्येक स्थानांचे कार्येश ग्रह काढू शकतो .
एकदा का कळाले  कि दशास्वामी कोणत्या भावांची फळे अधिकतेने देणार आहे  मग त्यानंतर त्या त्या दृष्टीने प्रत्येक भावांचा अभ्यास करता येतो .विरोधी स्थान म्हणजे काय ते खालील उदाहरणाने बघुयात . 

  उदा: आपण पत्रिकेत संतती संबंधी विचार पंचम स्थानावरून करतो . पंचमाचे व्यय ( आधीचे ) स्थान म्हणजे चतुर्थ स्थान . संतती संबंधी विचार करताना जर चतुर्थ स्थानाच्या बलवान दशा / अंतर्दशा असतील तर संतती( मुल ) होण्यास अडचणी येतात .

 जर दशा / अंतर्दशा स्वामी संतती संबंधी स्थानाचा ( २,५,११ ) कार्येश नसून चतुर्थ स्थानाचा एकमेव कार्येश असेल तर त्या दशेत / अंतर्दशेत  संतती होत नाही. गर्भधारणाच होत नाही ( conceive होत नाही  )  . 

जर दशा / अंतर्दशा स्वामी संतती संबंधी स्थानाचा ( २,५,११ ) कार्येश असून  चतुर्थ स्थानाचा एकमेव कार्येश असेल तर त्या दशेत / अंतर्दशेत  गर्भधारणा होते पण abortion होतात .अशावेळेस योग्य दशेची वाट बघणे एवढेच आपल्या हातात असते .

प्रत्येक स्थानाबाबत आपल्याला अशी अनुमाने घेता येतील उदा . 
चतुर्थ  स्थानचे व्यय स्थान म्हणजे तृतीय  स्थान. जर दशा स्वामी तृतीय स्थानचा बलवान कार्येश असेल तर चतुर्थ स्थानावरून बघण्यात येणाऱ्या गोष्टीमध्ये अडथळे आणतो . जसे कि चतुर्थ स्थानावरून घर, वाहन , शिक्षण इ . गोष्टी बघतात . त्यामुळे अशावेळेस शिक्षण चालू असेल तर त्यात यश न मिळणे . घर ,वाहन इ . खरेदी प्रकरणात अडथळे येणे इ . गोष्टी होतील . परंतु समजा घर विकायचे असेल तर उलट त्या दृष्टीने मदत होईल कारण तृतीय हे घर बदलण्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे . 

 विवाहासंबंधी प्रश्न  आपण सप्तम स्थानावरून बघतो . समजा एखाद्या मुलाचा / मुलीचा लग्नासाठी वधु / वर  संशोधन चालू आहे व अंतर्दशा स्वामी फक्त सहाव्या स्थानाचा एकमेव कार्येश आहे तर ती अंतर्दशा संपेपर्यंत लग्न ठरणे कठीण .समजा लग्न झाल्यानंतर सहाव्या स्थानाची बलवान दशा  असेल तर मग वैवाहिक सौख्य मिळणे कठीण त्यातून जर तृतीय स्थानाशी संबंध आला तर मग घटस्फोट !अर्थात पत्रिकेत घटस्फोटाचे योग पण बघावे लागतीलच . 

तसेच नोकरी संबंधीचे प्रश्न षष्ठ स्थानावरून बघतात .दशास्वामी जर पंचमाचा बलवान कार्येश असेल नोकरी सुटण्याची शक्यता अधिक .पंचमाच्या जोडीने जर २, ६,१०,११ चा पण कार्येश असेल तर आधीची नोकरी सोडून दुसरी नोकरी मिळते  . तसेच नवम स्थान पण दशमस्थानाला व्यय स्थान असल्याने नोकरी संबंधात वाईटच फळे देते . 
वर दिलेली सर्व उदाहरणे कृष्णमुर्ती पद्धतीनेच दिली आहेत . पण ह्या विरोधी भावांच्या दशेचा मात्र अनुभव येतोच . 

ग्रहयोग हे घटना घडणार कि नाही हे ठरवताना जसे महत्वाचे असतात तसे दशास्वामी हा घटना कधी घडेल हे ठरवतो.  त्यावेळेस दशास्वामी त्या संबंधात विरोधी स्थानाचा बलवान कार्येश आहे का ते पाहणे फार महत्वाचे आहे . 

Sunday 12 January 2014

पत्रिकेतील ग्रहयोग भाग-२.


मागील लेखात आपण पत्रिकेतील काही ग्रहयोग पाहिले . ह्या लेखात केंद्र योग , प्रतियोग , षडाअष्टक योग ह्या  ग्रहयोगांची माहिती घेऊ .

केंद्रयोग : 
हा एक पत्रिकेतील अशुभ योग आहे . नैसर्गिक अशुभ ग्रहांचे केंद्र योग जास्त अशुभ समजले जातात .
ह्या ह्यायोगात व्यक्तींला  यश मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात . कोणत्या दृष्टीने ह्याचे फळ मिळेल ते त्या ग्रहांवर तसेच त्याच्या कारकात्वावर अवलंबून असते .
जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकमेकांपासून साधारण ९० अंशावर असतात  म्हणजेच एकमेकांपासून चवथ्या व दहाव्या स्थानात असतात तेव्हा ते केंद्र योगात असे म्हटले जाते .

उदा . जर मेष लग्न आहे . मेषेत १० अंशावर मंगळ  आहे व चतुर्थात कर्केत १० अंशावर शनि आहे . तर शनि - मंगळ केंद्र योग आहे असे म्हणतात . आता इथे हा शनि - मंगळ अंशात्मक दृष्टीअधिष्टीत केंद्र योग आहे . कारण मंगळाची चौथी दृष्टी शनि वर व शनीची दहावी दृष्टी मंगळावर आहे म्हणून याला दृष्टीअधिष्टीत केंद्र योग म्हटले आहे . तसेच शनि मंगळ दोन्हीही ग्रह १० अंशावर म्हणजे सारख्याच अंशावर आहेत म्हणून याला अंशात्मक केंद्र योग म्हटले आहे .
तसेच जर शुक्र- हर्शल केंद्र योग असेल तर वैवाहिक सुखात अडचणी / घटस्फोट वगेरे शक्यता असते अर्थात त्यासाठी सप्तमेश व सप्तम स्थानपण पहिले पाहिजे . शुक्र-  हर्शल नवपंचम योग उलट कलेत प्रगती , प्रेमविवाह  वगेरे दाखवतात .

प्रतियोग : 
हा एक पत्रिकेतील अशुभ योग आहे . नैसर्गिक अशुभ ग्रहांचे प्रतियोग योग जास्त अशुभ समजले जातात . 
जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकमेकांपासून साधारण १८० अंशावर असतात  म्हणजेच एकमेकांपासून  सातव्या  स्थानात असतात तेव्हा ते केंद्र योगात असे म्हटले जाते . 

उदा . जर  वृषभ  लग्न आहे . वृषभेत २० अंशावर शुक्र आहे व  सप्तमात  वृश्चिक राशीत २० अंशावर मंगळ आहे . तर शुक्र  - मंगळ प्रतियोग योग आहे असे म्हणतात. 

षडाअष्टक योग :

हा सुद्धा  एक पत्रिकेतील अशुभ योग आहे . 
जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकमेकांपासून साधारण १५० अंशावर असतात  म्हणजेच एकमेकांपासून  सहाव्या व आठव्या स्थानात असतात तेव्हा ते षडाअष्टक योगात आहेत असे म्हटले जाते . 


उदा . जर  मिथुन  लग्न आहे . मिथुनेत  ५ अंशावर बुध आहे व  षष्टात  वृश्चिक राशीत  ५ अंशावर मंगळ आहे . तर बुध - मंगळ षडाअष्टक योगात आहेत असे म्हटले जाते . 

वरील सर्व  योग हे त्यातील ग्रहाच्या कारकत्वाला बाधा / न्यूनता आणणारे आहेत . जसे वर उदाहरण दिले आहे शुक्र- हर्षल केंद्रयोग किंवा प्रतियोग हा वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हानी करणारा असतो . 
आता ह्या ग्रहांमध्ये जर एखादा किंवा एकाहून अधिक ग्रह वक्री असतील तर मग अशुभत्वात अजूनच भर पडते असे वाटते . 

मागे म्हटल्याप्रमाणे ग्रहयोगांमुळे पत्रिकेचा दर्जा ठरतो . बरेच अशुभयोग असणाऱ्या पत्रिकेत त्या त्या ग्रहांच्या काराकात्वामुळे ते सुख लाभत नाही अथवा खूप कष्टाने आयुष्य जाते कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही . 
याचाच अर्थ अशा लोंकानी हार न मानता सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे . 

Friday 10 January 2014

Birth Details कळवताना :

बर्याच वेळा मेल मधून birth details कळवताना लोकं गोंधळ करतात . विशेषत: जन्मवेळ !
am ऐवजी pm किंवा pm ऐवजी am  लिहितात  यासाठी 24 hour format मध्ये जन्मवेळ लिहिली तर गोंधळ होणार नाही . उदा : रात्री १२ नंतर ४५ मिनिटे जन्म असेल तर ००:४५ लिहावे , दुपारी १२:४५ असेल तर १२:४५ तसेच रात्री ८ वाजता जन्म असेल तर २०:०० असे लिहावे . जेणेकरून तुमच्याकडून चूक होणार नाही व माझाही वेळ वाचेल . 

Monday 6 January 2014

पत्रिकेतील ग्रहयोग -भाग १

पत्रिका बघताना सगळ्यात महत्वाचे मला  वाटते ते 'पत्रिकेतील ग्रहयोग ' . कोणत्याही पत्रिकेतील ग्रहयोगांमुळे पत्रिकेचा दर्जा  ठरत असतो .घटना कोणत्या काळात घडवण्याचा अधिकार महादशा स्वामीला  आहे  .परंतु  घटना  घडणार कि नाही  हे पत्रिकेतील ग्रहयोग  ठरवत असतात . उदा .   महादशा स्वामी  जरी संतती स्थान देत असेल तरी जर पत्रिकेतील ग्रहयोग जर संतती विरोधात असतील  संतती योग येतच नाही . त्यामुळे मला वाटते कि 'ग्रहयोग ' हे अत्यंत महत्वाचे ठरतात . तर आता हे योग कोणकोणते आहेत ते पाहू .
संपूर्ण राशीचक्र हे ३६० अंशाचे आहे . प्रत्येक रास ३० अंश असते .  एखादा ग्रह दुसर्या ग्रहापासून किती अंशावर आहे त्याप्रमाणे त्याचे योग  ठरतात  .
आता  ह्यामध्ये  शुभ योग कोणते आणि अशुभ योग कोणते तर , नवपंचम योग , लाभ योग हे शुभ योग आहेत . केंद्र योग , प्रतियोग , षडाअष्टक योग हे अशुभ योग आहेत . युती योगात कोणते ग्रह आहेत त्यावर त्याचे फळ अवलंबून आहे .
आता ह्या योगांची थोडक्यात माहिती पाहू .
पत्रिकेचा विचार करताना कोणत्याही फक्त एका ग्रहयोगाचा  विचार करू नये तर सगळ्या ग्रहयोगांचा साकल्याने विचार करायला हवा .

युति  योग :

जेव्हा दोन किंवा त्याहून अधिक ग्रह एकाच राशीत सारख्या अंशावर असतात त्यावेळेस ते युतीत आहेत असे म्हणतात .
उदा . शनी व मंगळ कर्केत आहेत व दोन्ही ग्रह १५ अंशावर आहेत तर शनि - मंगळ अंशात्मक ( एकाच अंशावर ) युती आहे असे म्हटले जाते
जलद गती ग्रह असेल तर साधारण ६ अंशात पण युती धरण्यास हरकत नाही .
उदा . समजा शुक्र व चंद्र वृषभेत आहेत . शुक्र १० अंशावर आहे व चंद्र ४  अंशावर आहे . म्हणजे दोन्ही ग्रहात ६ अंश फरक आहे . चंद्र जलद गती ग्रह असल्याने शुक्र - चंद्र  युतीत आहेत असे म्हणायला हरकत नाही . अशावेळेस शुक्र- चंद्र  युती योगाची फळे मिळतील .
नैसर्गिक शुभ  ग्रहांची युती  शुभ ( उदा. गुरु- शुक्र )व अशुभ ग्रहांची  युती  ( शनि - मंगळ ) अशुभ फळे देते . जन्मलग्नाप्रमाणे फळाची तीव्रता कमी जास्त असते .  एक अशुभ व एक शुभ ग्रहाची युती मिश्र स्वरूपाची फळे देते . बर्याच वेळा शुभ ग्रहाच्या कारकत्वात अशुभ ग्रहामुळे न्यूनता येत . उदा. गुरु - शनि युती संतती सुखाच्या  दृष्टीने चांगली नाही तसेच शुक्र- शनि युती विवाह / वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने . शुक्र- शनि युतीत बर्याच वेळा उशिरा विवाहाचा योग असतो .

नवपंचम योग : 

हा एक पहिल्या प्रतीचा शुभयोग आहे . जेव्हा एक ग्रह ( एकापेक्षा  जास्त ) दुसऱ्या   ग्रहापासून १२० असतो तेव्हा त्याला  ग्रह नवपंचम  योगात आहेत असे म्हणतात .
नवपंचम योगात एक ग्रह दुसर्या ग्रहापासून ५-९ स्थानात असतात .
उदा . मेष लग्न आहे . मेषेत मंगळ १० अंशावर आहे . सिंह राशीत  पंचमात गुरु १२ अंशावर आहे व नवमात धनु राशीत चंद्र ११ अंशावर आहे तर मंगळ - चंद्र - गुरु हे नवपंचम योगात आहेत असे म्हणतात .
जेव्हा नवपंचम योगात गुरु असतो तेव्हा त्याची शुभ दृष्टी दुसऱ्या ग्रहावर  येते . त्यामुळे  नवपंचम योगात गुरु असणे हे फारच  छान असते .
नवपंचम योग हे एकाच तत्वातल्या राशीत होत असतात . जसे इथे मेष,सिंह ,धनु ह्या तीनही राशी अग्निराशी आहेत .
पत्रिकेत जितके नवपंचम योग जास्त तितका पत्रिकेचा दर्जा वरचा होतो .
आपण जेव्हा म्हणतो कि अमुक एखादि व्यक्ती 'LUCKY ' आहे किंवा ज्यांना कमी कष्टात जास्त यश मिळते त्यावेळेस बर्याच वेळा अशा माणसाच्या पत्रिकेत नवपंचम योग झालेले आढळतात .

लाभयोग :

जेव्हा एक ग्रह ( एकापेक्षा जास्त )दुसर्या  ग्रहापासून ६० अंश अंतरावर असतो तेव्हा लाभ योग झाला असे म्हणतात .
लाभायोगात हे ग्रह एकमेकांपासून ३-११ अंतरावर असतात .
उदा . समजा मिथुन लग्न आहे . व्ययात वृषभेत ५ अंशावर गुरु आहे व कर्केत द्वितीय स्थानी शुक्र ४ अंशावर आहे तर गुरु-शुक्र लाभयोग झाला असे म्हणतात .
लाभयोग हा नवपंचम योगापेक्षा खालच्या प्रतीचा शुभ योग आहे .  हे योग बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगले असतात .

पुढील लेखात केंद्रयोग , षडाष्टक योग व  प्रतियोग ह्या योगांची माहिती देण्याचा प्रयत्न करते .




Wednesday 1 January 2014

पत्रिकेतील शुक्र

 शुक्र  हा  एक शुभ ग्रह आहे . खरे तर लग्न राशीप्रमाणे शुभ अशुभ ग्रह वेगळे असतात . नैसर्गिक शुभ अशुभ ग्रहांच्या वर्गीकरणानुसार शुक्र , गुरु , चंद्र , बुध हे शुभ ग्रह मानले   आहेत  तसेच मंगळ  ,शनि ,हर्षल  ह्यासारखे ग्रह हे पापग्रह मानले जातात . शुभ ग्रहांची दृष्टी शुभ व पापग्रहांची दृष्टी अशुभ धरतात . ( नैसर्गिक शुभ अशुभ ग्रहांचे वर्गीकरण  हे प्रामुख्याने दृष्टीयोग तसेच बाकी अशुभ योग उदा . केंद्र  योग वगेरे च्या विश्लेषणासाठी जास्त उपयोगी पडते. )

 ह्या लेखात आपण शुक्राचा विचार करू . शुक्र हा विवाहाचा तसेच कलेचा  कारक ग्रह आहे . शुक्रावरून कामसुख , प्रेमविवाह , वेगवेगळ्या कला , वैवाहिक सौख्य इ . गोष्टींचा विचार करतात . तसेच शुक्र हा सौदर्याचा कारक ग्रह आहे . विशेषत: डोळे ,केस हे शुक्राच्या अमलाखाली येतात . पत्रिकेतील शुक्र जर बलवान असेल तसेच जर तो इतर ग्रहाच्या शुभयोगात असेल तर रसिकता ,कलात्मक पिंड ,सौदर्य  इ. गोष्टी त्या व्यक्तीत पाहायला मिळतात .जेव्हा आपण म्हणतो कि अमुक एक व्यक्ती खूप romantic आहे तेव्हा ती व्यक्ती शुक्राच्या अमलाखाली असते .

पत्रिकेतील well  placed शुक्र  हा वरील गुण देतो . परंतु बिघडलेला म्हणजे पापग्रहांच्या कुयोगातील शुक्र त्या व्यक्तीस व्यसनी किंवा व्यभिचारी पण बनवतो . शुक्र विवाहाचा कारक ग्रह असल्यामुळे वैवाहिक सौख्य बघताना सप्तम स्थान सप्तमेश ह्याबरोबरच शुक्राला पण महत्व द्यावे लागते . घटस्फोटांच्या पत्रिकेत शुक्राचा हर्षलशी अशुभ योग झालेला आढळतो . प्रेमविवाह होणार्यांच्या पत्रिकेत शुक्र- हर्षल , शुक्र - मंगळ  शुभ योग आढळतो .

वृषभ व तूळ  ह्या शुक्राच्या राशी आहेत . मीन राशीतला शुक्र उच्च मानतात . कन्या हि शुक्राची नीच रास आहे . शुक्र मेष व वृश्चिक राशीत निर्बली मानतात .
शुक्राचे रत्न हिरा ( diamond ) आहे .

MEDICAL ASTROLOGY मध्ये शुक्रावरून वीर्यदोष,  नपुंसकत्व , गर्भाशयाचे विकार , घशाचे आजार इ.
आजकाल बर्याच लोंकाची life style healthy नसते  त्यामुळे  हॉटेलिंग , fast food , व्यायामाचा अभाव इ. गोष्टींमुळे होणारे आजार पण शुक्राच्या अमलाखाली येतात .
कोणत्याही ग्रहाची एक positive व एक negative  बाजू असते . positive   गोष्टी घेऊन negative गोष्टी टाळाव्यात .