Title

Astrology Blog by Anagha Bhade


Friday 20 February 2015

कृष्णमुर्ती पद्धत म्हणजे काय ?

ज्योतीष शास्त्रामध्ये भविष्य सांगण्याच्या विविध पद्धती आहेत . सर्वसामान्य पणे पारंपारिक पद्धती नुसार भविष्य कथन केले जाते ज्या मध्ये तुमची मूळ जन्मपत्रिका बघितली  जाते . पत्रिकेतील ग्रह त्यांचे एकमेकांशी होणारे योग , महादशा , गोचर इ. गीष्टींचा विचार केला जातो . परंतु ह्या पद्धती मध्ये कोणत्याही प्रश्नाकरता साधारण कोणत्या भावाचा व ग्रहांचा विचार करायचा हे ठरलेले असले तरी विशिष्ठ नियम नाहीत . त्यामुळे एक तर बऱ्याच  अभ्यास व अनुभव ह्यांच्या जोरावर  अचूकता येत जाते व बर्याच वेळा अभ्यासा पेक्षा अंत:स्फूर्तीचा भाग जास्त  असतो . तसेच फलादेश सांगताना नक्षत्रांचा फारसा उपयोग न केल्याने चुकण्याचा जास्त संभव असतो . त्यामुळे ह्यातील त्रुटींचा अभ्यास करून व त्यावर बरेच वर्षे संशोधन करून चेन्नई येथील के. एस . कृष्णमुर्ती ह्यांनी हि नवीन पद्धत शोधून काढली .
     
कृष्णमुर्ती पद्धत हि नक्षत्रांवर  आधारित आहे .  ह्यासाठी त्यांनी अनेक ज्योतिषविषयक संस्कृत ग्रंथ व तमिळ मधील नाडी  ग्रंथांचा अभ्यास केला . ह्या सगळ्या संशोधानातून त्यांनी एक महत्वाचा निष्कर्ष काढला व असा सिद्धांत मांडला कि
" कोणताही ग्रह हा त्याच्या दशेत किंवा अंतर्दशेत तो ज्या स्थानी आहे त्या संबंधी फल न देता त्याचा नक्षत्र स्वामी जिथे आहे व त्या नक्षत्र स्वामीच्या राशी जिथे आहेत त्याची प्रामुख्याने फले देतो " . 

त्यामुळे ग्रह पत्रिकेत उच्च राशीत आहे कि नीच राशीत आहे वगेरे गोष्टीना महत्व राहत नाही . 
तसेच कोणत्या भावांची फले मिळणार हे नक्षत्र स्वामी वर अवलंबून आहे व शुभ फळे मिळणार कि अशुभ हे त्याच्या उपनक्षत्र स्वामी ( sub ) वर अवलंबून आहे .
 आता sub म्हणजे काय हे बघू . ह्या पद्धती मध्ये प्रत्येक नक्षत्राचे नऊ विभाग केले आहेत ते समान नाहीत तर विशोत्तरी दशेच्या प्रमाणात प्रत्येक नक्षत्र विभागले आहे . त्या नऊ ग्रहांच्या प्रत्येक विभागास sub म्हणतात .

कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये फलादेश सांगताना प्रत्येक भावाचा उपनक्षत्र स्वामी तसेच प्रत्येक ग्रह कोणत्या ग्रहाच्या नक्षत्रात आहे व कोणत्या ग्रहाच्या उपनक्षत्रात आहे हे माहिती असणे आवश्यक आहे तसेच भावचलित कुंडली द्वारेच बघणे योग्य आहे .
आता ह्या पद्धतीची वैशिठ्य म्हणजे फालादेश सांगण्यासाठी वापरण्यात येणारे ठराविक नियम  , तसेच येणाऱ्या महादशांचे interpretation करणे ह्या पद्धती मध्ये सोपे जाते . तसेच ruling planet म्हणजे तात्कालिक ग्रहांचा आधार घेऊन जास्तीत जास्त अचूक उत्तरे मिळतात .

त्यामुळे कृष्णमुर्ती पद्धतीचा वापर करून  शिक्षण कोणत्या शाखेचे  घ्यावे, नोकरी करावी कि व्यवसाय , कोणत्या  प्रकारह व्यवसाय करावा , विवाहाचा योग कधी आहे , विवाहासाठी पत्रीकामेलन ( ह्यात फक्त गुणमेलन अपेक्षित नाही तर दोन्ही पत्रिकांचा वैवाहिक सौख्याच्य दृष्टीने ग्रहयोग व पुढे येणाऱ्या दशा ह्या सर्वांचा विचार करावा लागतो ) 
संतती संबंधी प्रश्न , घरासाबंधी प्रश्न , उच्च शिक्षण , परदेशगमन इ. गोष्टी बद्दल मार्गदर्शन करता येते . 
तसेच प्रश्नकुंडली च्या आधारे वरील कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देता येते . ज्यावेळेस जन्मवेळ माहिती नसते त्यावेळेस प्रश्नकुंडली नेहेमीच उपयोगी पडते तसेच  हरवलेली वस्तू सापडेल का ? कुठे ? कधी ? असे प्रश्न पण प्रश्नकुंडली द्वारे बघता येतात . 




Wednesday 11 February 2015

हरवलेले घड्याळ

आमच्या एका ओळखीच्यांचे घड्याळ हरवले होते . ते एका पार्टी ला जाऊन घरी आले आणि मग नंतर त्यांना ते घड्याळ  काही केल्या सापडेना  घरात पण खूप शोधले . दहा हजार रुपयांचे घड्याळ सापडत नाही म्हटल्यावर ते अस्वस्थ झाले . त्यांना मग कृष्णमुर्ती पद्धती मध्ये ' हरवलेल्या वस्तू ' सापडतील का ? कधी ? कुठे ? असे प्रश्न विचारता येतात हे नुकतेच  कळाले होते त्यामुळे लगेचच  मला फोन केला .  फोन करण्याआधी त्यांनी ते घड्याळ घरात शोधण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न केला होता हे त्यांच्याकडून कळालेच . त्यांना मग मी ' माझे घड्याळ सापडेल का ? ' हा प्रश्न मनात ठेवून १-२४९ ह्या मधील कोणताही एक नंबर सांगा असे मी सांगितले . त्यांनी लगेच १५० नंबर सांगितला . मी मग १५० नंबर वरून प्रश्नकुंडली बघितली .
१५० नंबर  म्हणजे वृश्चिक लग्न येते . १५० नंबर ची प्रश्नकुंडली खाली देत आहे . 


सर्वसाधारण पणे  मौल्यवान वस्तू , दागिने वगेरे द्वितीय भावावरून बघतात . हरवलेल्या वस्तू मिळतील का ? ह्या प्रश्नासंबंधी चा नियम असा आहे कि जर प्रश्नकुंडलीतील लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ती वस्तू ज्या भावावरून बघतात त्या भावाचा कार्येश असेल व वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसेल तर ती हरवलेली वस्तू मिळते . 
ह्या पत्रिकेमध्ये लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र आहे . चंद्र कधीच वक्री नसतो तसेच चंद्र मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ पण मार्गी आहे  ह्याचाच अर्थ असा कि चंद्र मंगळाच्या माध्यमातून ६ व ११ ह्या भावांचा कार्येश आहे . आता इथे खरेतर द्वितीय ( मौल्यवान वस्तू ) ह्या भावाशी चंद्राचा  थेट सबंध येत नाही पण तरीही घड्याळ मिळेल असे सांगितले कारण माझ्या बघण्यात असे आले आहे कि  लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर ६ व ११ चा कार्येश असेल तर शक्यतो वस्तू मिळते . तसेच लाभ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र हा मंगळाच्या नक्षत्रात आहे व प्रथमात वृश्चिक रास असल्याने  प्रथम भावाचा कार्येश आहेच . त्यामुळे  त्यांची घड्याळ सापडण्याची इच्छा पूर्ण होईल . ह्या सगळ्याचा सारासार विचार करून घड्याळ मिळेल असे सांगितले . आता कुठे मिळेल हे पाहण्यासाठी द्वितीय भावाचा उपनक्षत्र स्वामी पहिला तो मंगळ आहे . मंगळ  चतुर्थात कुंभ राशीत आहे  . त्यामुळे घड्याळ घरातच असावे असे अनुमान केले कुंभेत मंगळ गुरूच्या नक्षत्रात आहे . ह्याचा अर्थ घरात जिथे study रूम आहे किंवा जिथे बसून वाचन किंवा कॉम्पुटर वर काम केले जाते अशा जागी घड्याळ सापडण्याची शक्यता जास्त आहे . अशा जागी शोध म्हणून सांगितले . 
दुसर्याच दिवशी त्यांचा मेसेज आला कि घड्याळ सापडले ते  ज्या सोफ्यावर बसून नेहेमी पेपर वाचतात किंवा laptop घेऊन काम करतात त्या सोफ्याखाली घड्याळ सापडले .प्रश्नकुंडली मध्ये पण राहू लाभत आहे . प्रश्नावेळेस रवी, बुध ( राहू ) , मंगळ , चंद्र असे होते . घड्याळ सापडले तेव्हा चंद्र राहूच्याच  नक्षत्रात होता . 
बघा ग्रह कसे मार्गदर्शन करत असतात ते . 

Thursday 5 February 2015

ज्योतिषशास्त्र / पत्रिका समज - गैरसमज व उपयोग

 खरे तर तसे ब्लॉग वर आत्तापर्यंत बर्याच लेखांमधून पत्रिकेचा  आपल्या आयुष्यात कसा उपयोग करून घेता येईल ह्या बद्दल लिहिले आहेच .तरीही सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांचा असा समाज असतो कि पत्रिका दाखवून भविष्यात घडणाऱ्या  काही वाईट गोष्टींची माहिती आत्तापासून घेऊन वर्तमान पण खराब करण्यात काय अर्थ आहे . हे त्यांचे मत एका दृष्टीने बरोबर असले तरी कोणताही सुज्ञ ज्योतिषी अशा गोष्टी सांगत नाही ज्या योगे  त्या व्यक्तीस त्रास होईल . दुसरे म्हणजे  ज्योतिषशास्त्राचा उपयोग हा आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी करावा ज्या योगे जगणे सुखाचे होईल . तसेच आपल्यातील positve गोष्टींचा तसेच पुढे येणारा काळ कोणत्या गोष्टी सुचित करत आहे त्याप्रमाणे प्रयत्नांची दिशा ठरवल्यास नक्कीच यशस्वी होण्यास मदतच होते .

मी नेहेमी सांगत असते कि पत्रिकेचा वापर हा एक मार्गदर्शक म्हणून करावा . सध्या धकाधकीच्या जीवनात बर्याच प्रकारचे ताण असतात मग ते नात्यामधले असतात , करियर , शिक्षण ( सध्या मुलांच्या शिक्षणाचा ताण हे मुलांपेक्षा पालकांनाच जास्त असतो ) , पैसा (जो कितीही मिळवला तरी बऱ्याच जणांना कमीच वाटतो ), लग्न ठरत नाही म्हणून, लग्न झाल्यावर पटत नाही म्हणून , मुल होत नाही म्हणून , मुले असली तर त्यांच्या भविष्याची काळजी म्हणजे त्यांना कोणती वाईट सांगत तर लागणार नाही ना त्यांचे करियर कसे होईल किंवा सध्या बऱ्याच क्लासेस  ( संगीत , dance , चित्रकला ,कराटे , cricket ,टेनिस , वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ) मध्ये घालाण्याची चढाओढ  खूप असते भले त्या मुलाचा त्या गोष्टीत रस असो वा नसो .  असे बऱ्याच प्रकारचे स्ट्रेस असतात . आता ह्या सगळ्यात पत्रिका कशी उपयोगी पडेल बरे ते पाहूयात .

पत्रिकेवरून साधारण व्यक्तीचा कल कुठल्या विषयात आहे ते समजू शकते त्याप्रमाणे त्याच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रयत्न करता येतात . तसेच शिक्षणाच्या दृष्टीने पण पत्रिका कोणती शाखा दर्शवते आहे , त्या मुलाची बौद्धिक पातळी तसेच पुढे येणाऱ्या दशा कोणत्या क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत . ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधता येतो . बऱ्याच वेळा मुले खूप गोंधळलेली असतात नेमके आपल्याला काय करायला आवडेल तसेच  काय  करता येईल व  सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यातून आयुष्यात समाधान आणि पैसा दोन्ही मिळेल का ? असे प्रश्न पडतात . त्या दृष्टीने पण पत्रिका मार्गदर्शन करू शकते . इथे ' मार्गदर्शन ' हा शब्द मुद्दामूनच वापरत आहे कारण पत्रिकेचे  काम हे guidance  करण्याचे आहे शेवटी प्रयत्न त्या व्यक्तीला करणे क्रमप्राप्तच असते . ' There is no alternative for hard work ' फक्त कोणत्या दिशेन प्रयत्न करायचे हे मार्गदर्शन मात्र पत्रिकेतून  मिळू शकते . 

पत्रिकेवरून जसे शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन मिळते तसेच करियर कोणत्या क्षेत्रात करावे नोकरी करावी कि व्यवसाय , लग्नाचा योग कधी आहे , संतती होण्यासंबंधी काही समस्या असतील तर कोणत्या काळात मेडिकल treatment घ्यावी , घर किवा property मध्ये investment करावी का ? तसेच आपल्याला होणाऱ्या संभाव्य आजार कोणते असू शकतील त्या दृष्टीने काळजी आधीपासून घेता येऊ शकेल जेणेकरून आजाराचे स्वरूप आटोक्यात आणता येईल .
नवरा बायकोचे पटत नसेल तर घटस्फोट घ्यावा का ? दुसऱ्या विवाहानंतर तरी वैवाहीक सौख्य आहे का?
समजा अगदी घटस्फोट घेण्यासारखे  कुयोग पत्रिकेत नसतील व पुढे येणाऱ्या दशा वैवाहिक सौख्यास support करत असतील तर दोघांना सामजस्याने राहा असे  समजावून सांगता येते . ज्याला आपण astro - counselling म्हणू शकतो .
तसेच परदेशात जाण्याचा योग आहे का ? उच्च शिक्षणाकरता परदेशात  संधी मिळेल का ? अशा बर्याच  प्रश्नांचे मार्गदर्शन मिळू शकते .

ज्योतिषशास्त्रा मध्ये एक प्रश्नकुंडली म्हणून फार उपयोगी प्रकार आहे ज्यायोगे कोणत्याही एका प्रश्नाकरता कुंडली मांडता येते मात्र प्रश्न विचारात असणाऱ्या व्यक्तीस त्या प्रश्नाची तळमळ मात्र हवी उगाच time -pass म्हणून विचारून उत्तर कधीहि बरोबर येणार नाही . ह्या प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून हरवलेली वस्तु परत मिळेल का ? कधी ?साधारण कुठे? असे अंदाज बांधता येतात .तसेच बर्याच वेळा जन्माची अचूक वेळ माहिती नसते  त्यावेळेस पण बरेच प्रश्न प्रश्नकुंडली वरून सोडवता येतात जसे लग्न कधी होईल, नोकरी कधी लागेल , बदली होईल का , प्रमोशन मिळेल का ?एखादी जागा / flat घेणे लाभदायक ठरेल का ? असे बरेच प्रश्न' प्रश्नकुंडली' च्या आधारे सोडवता येतात . ह्यामध्ये कृष्णमुर्ती पद्धत फार प्रभावी वाटते .

आपल्याला ह्या जन्मी जे भोगायचे आहे किंवा उपभोगायचे आहे त्याचा आराखडा जरी ठरलेला असला तरी आपल्या प्रयत्नांनी आपण नक्कीच जीवन सुसह्य आणि सुखी कर शकतो व योग्य दिशेने प्रयत्न करण्यासाठी पत्रिकेचा वापर निश्चितच होऊ शकतो असे मला वाटते.