Title

Astrology Blog by Anagha Bhade


Monday 6 January 2014

पत्रिकेतील ग्रहयोग -भाग १

पत्रिका बघताना सगळ्यात महत्वाचे मला  वाटते ते 'पत्रिकेतील ग्रहयोग ' . कोणत्याही पत्रिकेतील ग्रहयोगांमुळे पत्रिकेचा दर्जा  ठरत असतो .घटना कोणत्या काळात घडवण्याचा अधिकार महादशा स्वामीला  आहे  .परंतु  घटना  घडणार कि नाही  हे पत्रिकेतील ग्रहयोग  ठरवत असतात . उदा .   महादशा स्वामी  जरी संतती स्थान देत असेल तरी जर पत्रिकेतील ग्रहयोग जर संतती विरोधात असतील  संतती योग येतच नाही . त्यामुळे मला वाटते कि 'ग्रहयोग ' हे अत्यंत महत्वाचे ठरतात . तर आता हे योग कोणकोणते आहेत ते पाहू .
संपूर्ण राशीचक्र हे ३६० अंशाचे आहे . प्रत्येक रास ३० अंश असते .  एखादा ग्रह दुसर्या ग्रहापासून किती अंशावर आहे त्याप्रमाणे त्याचे योग  ठरतात  .
आता  ह्यामध्ये  शुभ योग कोणते आणि अशुभ योग कोणते तर , नवपंचम योग , लाभ योग हे शुभ योग आहेत . केंद्र योग , प्रतियोग , षडाअष्टक योग हे अशुभ योग आहेत . युती योगात कोणते ग्रह आहेत त्यावर त्याचे फळ अवलंबून आहे .
आता ह्या योगांची थोडक्यात माहिती पाहू .
पत्रिकेचा विचार करताना कोणत्याही फक्त एका ग्रहयोगाचा  विचार करू नये तर सगळ्या ग्रहयोगांचा साकल्याने विचार करायला हवा .

युति  योग :

जेव्हा दोन किंवा त्याहून अधिक ग्रह एकाच राशीत सारख्या अंशावर असतात त्यावेळेस ते युतीत आहेत असे म्हणतात .
उदा . शनी व मंगळ कर्केत आहेत व दोन्ही ग्रह १५ अंशावर आहेत तर शनि - मंगळ अंशात्मक ( एकाच अंशावर ) युती आहे असे म्हटले जाते
जलद गती ग्रह असेल तर साधारण ६ अंशात पण युती धरण्यास हरकत नाही .
उदा . समजा शुक्र व चंद्र वृषभेत आहेत . शुक्र १० अंशावर आहे व चंद्र ४  अंशावर आहे . म्हणजे दोन्ही ग्रहात ६ अंश फरक आहे . चंद्र जलद गती ग्रह असल्याने शुक्र - चंद्र  युतीत आहेत असे म्हणायला हरकत नाही . अशावेळेस शुक्र- चंद्र  युती योगाची फळे मिळतील .
नैसर्गिक शुभ  ग्रहांची युती  शुभ ( उदा. गुरु- शुक्र )व अशुभ ग्रहांची  युती  ( शनि - मंगळ ) अशुभ फळे देते . जन्मलग्नाप्रमाणे फळाची तीव्रता कमी जास्त असते .  एक अशुभ व एक शुभ ग्रहाची युती मिश्र स्वरूपाची फळे देते . बर्याच वेळा शुभ ग्रहाच्या कारकत्वात अशुभ ग्रहामुळे न्यूनता येत . उदा. गुरु - शनि युती संतती सुखाच्या  दृष्टीने चांगली नाही तसेच शुक्र- शनि युती विवाह / वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने . शुक्र- शनि युतीत बर्याच वेळा उशिरा विवाहाचा योग असतो .

नवपंचम योग : 

हा एक पहिल्या प्रतीचा शुभयोग आहे . जेव्हा एक ग्रह ( एकापेक्षा  जास्त ) दुसऱ्या   ग्रहापासून १२० असतो तेव्हा त्याला  ग्रह नवपंचम  योगात आहेत असे म्हणतात .
नवपंचम योगात एक ग्रह दुसर्या ग्रहापासून ५-९ स्थानात असतात .
उदा . मेष लग्न आहे . मेषेत मंगळ १० अंशावर आहे . सिंह राशीत  पंचमात गुरु १२ अंशावर आहे व नवमात धनु राशीत चंद्र ११ अंशावर आहे तर मंगळ - चंद्र - गुरु हे नवपंचम योगात आहेत असे म्हणतात .
जेव्हा नवपंचम योगात गुरु असतो तेव्हा त्याची शुभ दृष्टी दुसऱ्या ग्रहावर  येते . त्यामुळे  नवपंचम योगात गुरु असणे हे फारच  छान असते .
नवपंचम योग हे एकाच तत्वातल्या राशीत होत असतात . जसे इथे मेष,सिंह ,धनु ह्या तीनही राशी अग्निराशी आहेत .
पत्रिकेत जितके नवपंचम योग जास्त तितका पत्रिकेचा दर्जा वरचा होतो .
आपण जेव्हा म्हणतो कि अमुक एखादि व्यक्ती 'LUCKY ' आहे किंवा ज्यांना कमी कष्टात जास्त यश मिळते त्यावेळेस बर्याच वेळा अशा माणसाच्या पत्रिकेत नवपंचम योग झालेले आढळतात .

लाभयोग :

जेव्हा एक ग्रह ( एकापेक्षा जास्त )दुसर्या  ग्रहापासून ६० अंश अंतरावर असतो तेव्हा लाभ योग झाला असे म्हणतात .
लाभायोगात हे ग्रह एकमेकांपासून ३-११ अंतरावर असतात .
उदा . समजा मिथुन लग्न आहे . व्ययात वृषभेत ५ अंशावर गुरु आहे व कर्केत द्वितीय स्थानी शुक्र ४ अंशावर आहे तर गुरु-शुक्र लाभयोग झाला असे म्हणतात .
लाभयोग हा नवपंचम योगापेक्षा खालच्या प्रतीचा शुभ योग आहे .  हे योग बुद्धिमत्तेच्या दृष्टीने चांगले असतात .

पुढील लेखात केंद्रयोग , षडाष्टक योग व  प्रतियोग ह्या योगांची माहिती देण्याचा प्रयत्न करते .




No comments:

Post a Comment